
साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून केल्याची खळबळजनक घटना नुकतीच नसरापूर (ता.भोर) येथे घडली. त्याचे तीव्र पडसाद राज्यासह इचलकरंजीतही उमटले. सकल ब्राह्मण समाज इचलकरंजी यांचे वतीने या प्रकरणातील नराधमाला त्वरित फाशीची शिक्षा द्यावी, राज्यात पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी याबाबतचे कायदे कडक करावेत, अशा मागणीचे निवेदन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना देण्यात आले. तत्पूर्वी प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
निवेदनात, नसरापूर (ता. भोर) येथे घडलेली घटना अत्यंत क्रूर, अमानुष व संतापजनक आहे. चार वर्षाच्या निरागस चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्दयीपणे हत्या करण्यात आली. या घटनेने संपर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात नराधम आरोपीला अटक करण्यात आली असली तरी अशा प्रकारच्या भयंकर कृत्यामूळे समाजातील महिलांच्या व लहान बालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच आरोपीस कठोरात कठोर म्हणजे मृत्युदंडाची शिक्षाच योग्य आहे. नसरापूरसारख्या घटना राज्यात पुन्हा कुठेच घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली पाहिजेत. तसेच शासनानेही पोलिसांचे हात बळकट करणारे कायदे बनवले पाहिजेत. त्यामुळे नराधमास फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी सकल ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी व समाजातील बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.